मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवानंतर काँग्रेस पक्षाने राज्यात मोठे फेरबदल केले आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नवीन नेतृत्वाची निवड करण्यात आली आहे. राहुल गांधींचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू अशी ओळख असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे काँग्रेसला नवी ऊर्जा मिळेल आणि पक्ष संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आहे.
सध्या हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संगठनचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारधारेवर आधारित ग्रामस्वराज्य निर्मितीत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. सपकाळ यांना सर्वोदय विचारांवर आधारित राष्ट्रनिर्माण युवक शिबिरांचे आयोजन, ग्रामस्वच्छता अभियान आणि आदर्श ग्राम चळवळीतील सक्रिय सहभाग असा व्यापक अनुभव आहे. त्यांच्या या सामाजिक योगदानामुळे त्यांना काँग्रेसमध्ये विशेष स्थान मिळाले आहे.
२०१४ ते २०१९ या काळात त्यांनी ‘जलवर्धन’ हा जलसंधारण व जलव्यवस्थापन प्रकल्प यशस्वीपणे राबवला. या उपक्रमामुळे अनेक गावांमध्ये पाणीटंचाई दूर होऊन जलसाक्षरता वाढीस लागली. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना सामाजिक आणि राजकीय स्तरावर मोठी लोकप्रियता मिळाली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष राज्यात नव्या उमेदीने कार्यरत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी काळात पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देत काँग्रेसला पुन्हा सत्तेच्या दिशेने नेण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे. सपकाळ यांच्या नियुक्तीनंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.