जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अभिवादनपर कार्यक्रम उत्साहात पार पडला. सामाजिक न्याय, समता आणि संविधानाच्या मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मेणबत्ती प्रज्वलित करून त्यांना अभिवादन करण्यात आले. संपूर्ण परिसरात आदर आणि कृतज्ञतेचे वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, संचालक डॉ. एन. एस. आर्वीकर, रजिस्टर प्रमोद भिरूड, संगणक विभागाचे भूषण चौधरी यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवत बाबासाहेबांच्या विचारांप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.
यावेळी बोलताना डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती करून समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून दिला. त्यांनी दिलेले विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत. भारतासह जगातील अनेक देशांमध्येही बाबासाहेबांच्या स्मृती जतन केल्या जात असून त्यांच्या कार्याची दखल घेतली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या जयंतीनिमित्त गोदावरी फाउंडेशनतर्फे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, समतेची भावना आणि संविधानाबद्दल आदर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बाबासाहेबांच्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.



