अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील जानवे शिवारातील शेतात विहिरीतील मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायतीच्या शिपायाचा .तोल गेल्याने विहिरीत पडून बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी २४ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिपक बाबुलाल पाटीलवय ४५ रा. जानवे ता.अमळनेर असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
दीपक पाटील हे जानवे ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते आणि गावातील पाणीपुरवठ्याच्या पाच विहिरींवरील मोटारी सुरू-बंद करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. शनिवारी दुपारी ते गावातील ‘मडक्या विहीर’ येथे मोटार चालू करण्यासाठी गेले होते. मोटार सुरू होत नसल्याने त्यांनी पाईप हलवून ती सुरू करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा अचानक तोल गेला आणि ते विहिरीत पडले. ग्रामस्थांनी तातडीने त्यांना विहिरीतून बाहेर काढून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे पाटील कुटुंबीय आणि गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.