शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कृषी निविष्ठा तक्रार निवारण कक्ष स्थापन

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खरीप हंगाम २०२४ मध्ये शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या उपलब्धते तसेच गुणवत्तेबाबत येणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेने विशेष कक्ष स्थापन केला आहे. या कक्षात शेतकऱ्यांच्या तक्रारींची नोंदणी केली जाणार असून, त्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील किंवा तालुक्यातील कृषीविषयक समस्यांसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे अधिक सुलभ होणार आहे.

जिल्हा परिषदेने याबाबत सविस्तर माहिती सार्वजनिक केली आहे. तालुका कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषी), सहाय्यक कृषी अधिकारी आणि मोहळ अधिकाऱ्यांची नावे, पद आणि संपर्क क्रमांक यात देण्यात आले आहेत. जळगाव जिल्हा परिषदेत विजय दत्तू पवार (मोहीम अधिकारी- ९४२३४८२२७४), राहुल अनिल महाजन (कृषी अधिकारी- ९६०४८४९४४४) आणि अभिमान किशोर माळी (जिल्हा कृषी अधिकारी (सा.)- ९४२२२३५८१३) हे अधिकारी कार्यरत आहेत.

याव्यतिरिक्त, जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती स्तरावर संबंधित कृषी अधिकाऱ्यांची आणि विस्तार अधिकाऱ्यांची नावे व संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, जामनेर, अमळनेर, चोपडा, पारोळा, एरंडोल आणि धरणगाव येथील पंचायत समित्यांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची संपर्क माहिती या यादीत समाविष्ट आहे.

या संपर्क माहितीमुळे शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळवणे, कृषी मार्गदर्शन घेणे, तसेच पिकांवरील रोग व किडींच्या नियंत्रणासाठी योग्य सल्ला मिळवणे शक्य होणार आहे. हा तक्रार निवारण कक्ष खरीप हंगामासाठी १५ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ आणि रब्बी हंगामासाठी १५ सप्टेंबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे. संपर्क यादी जिल्हा परिषद कार्यालय आणि संबंधित पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध आहे.

Protected Content