नाथाभाऊ आणि मी एकमेंकांची पाठराखण करतो- पालकमंत्री ना. गिरीश महाजन

Girish Mahajan Eknath 696x364

जळगाव प्रतिनिधी । पुरग्रस्तांना मदत करीत असतांना काढलेल्या सेल्फीबाबत नाथाभाऊंनी माझी पाठराखण केली. नाथाभाऊ नेहमीच माझी पाठराखण करतात. एवढेच नाही तर आम्ही दोघेही नेहमी एकमेकांची पाठराखण करतो अशी प्रतिक्रिया पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी मिश्किल हास्य करत आपली प्रतिक्रिया दिली.

भाजपच्या शक्तिकेंद्र प्रमुखांच्या बैठकीसाठी ते आज शहरात आले होते. सेल्फी प्रकरणानंतर एकनाथ खडसेंनी त्यांची पाठराखण करण्यावरून पत्रकारांनी प्रश्न केला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यामुळे खडसे व महाजन समर्थकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पूरग्रस्तांना मदत करीत असताना काढलेल्या सेल्फीमुळे टिकेच्या तावडीत सापडलेले ना. महाजन यांच्या समर्थनार्थ एकनाथ खडसे पुढे सरसावले होते. माध्यमांनी ना. महाजन यांच्या चांगल्या कामाची दखल न घेता सेल्फी घेण्याच्या विषयावरून त्यांना नाहक लक्ष केले, अशी प्रतिक्रिया खडसेंनी महाजन यांची पाठराखण करताना दिली होती. दरम्यान, महाजन खडसेंच्या बाबतीत मोकळेपणाने प्रतिक्रिया देणे टाळतात. आज मात्र, त्यांनी खडसेंच्या बाबतीत मौन सोडल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.

लवकरच कृत्रिम पावासाचा निर्णय
राज्यातील मराठवाड्यात पुरेसा पाऊस झालेला नसल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथील 9 ते 10 धरणे कोरडीठाक आहेत. त्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्याचा राज्य शासनाचा प्रयत्नशिल असून त्यासंदर्भात हालचाली देखील सुरू आहेत. नवे तंत्रज्ञान वापरून काही करता येईल का, याचा विचार आम्ही करतोय. येत्या 2 दिवसात कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत निर्णय होईल, अशी माहिती देखील जलसंपदामंत्री ना. महाजन यांनी यावेळी दिली.

कर्ज घेऊन रखडलेले सिंचन प्रकल्प पुर्ण होणार – ना. महाजन

राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांसाठी पूर्वीच्याच व्याज दराने बाहेरून कर्ज घेण्याचा निर्णय शासनाने घेतला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर सकारात्मक चर्चा झाली आहे. यापूर्वी केंद्राच्या नाबार्डकडून सिंचन प्रकल्पांसाठी कर्ज घेतले जात होते. परंतु, आता केंद्राच्या भरवश्यावर न राहता मोठ्या सिंचन प्रकल्पांसाठी बाहेरून सुमारे 15 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील पाडळसरे प्रकल्प, हतनूर धरणाचे पाणी वळविण्याचा प्रकल्प मार्गी लागतील, अशी अपेक्षा असल्याचेही ना. महाजन यांनी सांगितले.

विरोधकांना बोलायला काय लागते?
पूरग्रस्तांसाठी राज्य शासनाने केंद्राकडे 6 हजार 800 कोटी रुपयांची मदत मागितली आहे. ही मदत तुटपुंजी असून शासनाने सध्याच्या आकस्मिक निधीतून रक्कम काढून पूरग्रस्त लोकांना तातडीने मदत करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. या विषयावरून गिरीश महाजन यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पश्चिम महाराष्ट्रातील आपत्तीचा अभ्यास करूनच आम्ही केंद्राकडे मदत मागितली आहे. शेतीसाठी किती मदत द्यावी लागेल, नागरिकांना किती मदत करावी लागेल, याचा अंदाज घेऊनच आम्ही नियोजन केले आहे. मात्र, विरोधकांना बोलायला काय लागते? काहीही अभ्यास करायचा नाही, आणि वाट्टेल ते मागायचे, अशा शब्दांत महाजन यांनी विरोधकांच्या भूमिकेचा समाचार घेतला.

Protected Content