रावेर (प्रतिनिधी) शहरासह परीसरात मोठ्या प्रमाणात चाऱ्याची टंचाई जाणवत असल्याने गुरे मालकांना कडाक्याच्या उन्हात चाऱ्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. आधीच वाढत्या तापमानामुळे जंगलातून वनस्पती आणि गवत नष्ट झाले आहे. तालुक्यात दुष्काळ असल्याने चारा छावणी सुरु करण्याची मागणी जनतेतुन करण्यात येत आहे.
यंदा तालुक्यात भीषण दुष्काळ असुन त्याचे चटके नागरिकांना जाणवत असतांना आता त्याचा फटका पशुधनालाही बसू लागला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी आहेत. शहरासह परिसरात शेळ्या, मेंढया, गायी, म्हशी, बैल, इत्यादी मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी आहेत. तालुक्यात यंदा दुष्काळाचा फटका शेतकरी, पाळीव प्राणी व सामान्य नागरिक सर्वांनाच बसला आहे.