नवी दिल्ली वृत्तसंस्था । आजपासून राष्ट्रीय महामार्गावर टोल नाक्यावरुन जाणाऱ्या गाड्यांवर फास्टॅग असणे अनिवार्य असणार आहे. केंद्र सरकारने डिजिटल पेमेंटला चालना देण्यासोबत प्रदूषण कमी करणे आणि लांब लचक वाहन्यांचा त्रास कमी करण्यासाठी हा उपक्रम सुरु केला आहे. मात्र जर तुमच्या गाडीवर फास्टॅग नसेल तर वाहनधारकांना टोल नाक्यावर दुप्पट टोलची रक्कम भरावी लागणार आहे.
सुरुवातीला टोल नाक्यांवरील ७५ टक्के मार्गिकांवरच ही योजना असेल, तर उर्वरित मार्गिकांवर टोल भरण्यासाठी रोख रक्कमेची सुविधा असणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. याआधी १ डिसेंबरला योजना लागू केली जाणार होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या टोलनाक्यांवर वाहन चालकांना मोठय़ा रांगांना सामोरे जावे लागते. सध्या टोलनाक्यांवर एका मार्गिकेतून जाताना फास्टॅगची योजना, तर उर्वरित मार्गिकेतून जाताना रोख रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे वाहन चालकांचा गर्दीच्या वेळेतील प्रवास अत्यंत धीमा होत होता. हे टाळण्यासाठी ‘वन नेशन वन फास्टॅग’ योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. टोलनाक्यांवरील सर्व मार्गिकांवर तर उर्वरित एकाच मार्गिकेवर रोख रक्कम भरण्याची सुविधा अंमलात आणली जाणार होती. मात्र १५ डिसेंबरपासून अंमलात येणाऱ्या योजनेत आता टोलनाक्यांवरील ७५ टक्के मार्गिकांवरच फास्टॅग असेल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली.