शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे आणि निर्यातक्षम बनावे: जिल्हाधिकारी आयुष प्रसाद


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत शेतीत प्रयोगशीलता अंगीकारावी आणि स्वतः निर्यातक्षम बनावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे महत्त्वाचे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित कृषी दिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, गट विकास अधिकारी श्वेता पालवे, बंजारा टायगर्स संघटनेचे अध्यक्ष आत्माराम जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी प्रगतीशील शेतकरी, शेती क्षेत्रात विविध प्रयोग करणारे शेतकरी आणि महिला बचत गटाच्या प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, महाराष्ट्राच्या जडणघडणीत वसंतराव नाईक यांचा महत्त्वाचा वाटा आहे. देशाला दिशा देण्याचे काम त्यांनी केले. राज्यात एमआयडीसीचे जाळे विस्तारण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शेती क्षेत्रातील सुधारणांचे जनक आणि हरित क्रांतीचे प्रणेते म्हणूनही त्यांना ओळखले जाते.

जळगाव जिल्हा शेतीत अग्रेसर असला तरी अजूनही काही बदल करण्याची गरज आहे, असे प्रसाद यांनी नमूद केले. जिल्ह्यातील घटत चाललेली भूजल पातळी हा चिंतेचा विषय असून, ती वाढवण्यासाठी जल पुनर्भरण करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा परिषदेने मोठे पाऊल उचलले असले तरी, शेतकऱ्यांनीही जलतारासारखे उपक्रम राबवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. पेरणी करताना आंतरपीक पद्धतीचा वापर आणि बियाण्याच्या दर्जाकडे लक्ष देणे महत्त्वाचे असल्याचे सांगत, रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले.