शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा; अमोल जावळे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शेतकरी बांधवांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी साठी अजून एक संधी उपलब्ध करून देण्याच्या मागणी करीता भारतीय जनता पार्टी जळगाव पूर्वचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे.

राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना’ राबवली होती या योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असतांनाच राज्यात सत्ता बदल होऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले व त्यांनी नवीन अशी ‘महात्मा फुले शेतकरी कर्ज योजना’ राबवून कर्जमाफीसाठी पात्र ठरवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेतील शेतकऱ्यांना या योजनेत सामावून न घेता त्यांना कर्जमाफी पासून वंचित ठेवले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील तब्बल १९ हजार शेतकरी व राज्यभरातील २ लाख ७५हजार शेतकरी कर्जमाफी योजने पासुन वंचित राहिले आहेत.

राज्यात २००७ पासून एकदाही कर्ज माफी योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी शेतकरी बांधवांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी केल्यास जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचा याचा फायदा होईल शेतकरी बांधवांच्या या मागणीचा गांभीर्याने विचार करण्याचे निवेदनात अमोल हरिभाऊ जावळे यांनी म्हटले आहे.

Protected Content