खिरोदा शिवारात नवीन रोहित्र बसविण्याबाबत शेतकऱ्यांची मागणी

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील खिरोदा शिवारातील रोहित्र जळल्याने केळी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत वारंवार तक्रार देवूनही दुर्लक्ष होत असल्याने शिवारातील शेतकऱ्यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना निवेदन देवून व्यथा मांडली. यासंदर्भात माजी मंत्री खडसे यांनी महावितरण कंपनीशी संपर्क साधून नवीन रोहीत्र बसविण्याची विनंती केली आहे.

 

खिरोदा येथील फैजपूर रस्त्यावरील शेती शिवारातील शेतकऱ्यांची डीपी जळाल्यामुळे फरफट होत होती. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही त्यांनी नवीन ट्रान्सफॉर्मर देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आमदार शिरीष चौधरी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे डीपी मिळण्याची मागणी केली. मात्र आमदार चौधरी यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. त्यांनतर चोरांनी खांबावरील विद्युत वाहिन्यांची चोरी केली. याबाबत शेतकऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती देवून लवकर ट्रान्सफॉर्मर बसविण्याची विनंती केली. मात्र २० दिवस होऊनही डीपी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन शेतिच्या होणाऱ्या नुकसानीची व्यथा मांडली. माजी मंत्री खडसे यांनी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान,त्यांची परिस्थिती अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली.

 

वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखवत अगदी दोन दिवसात साहित्याची पूर्तता करून डीपी, तारां सहित, वीज जोडणी करून दिली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी मुक्ताईनगर येथे जाऊन खडसे यांचे ऋण व्यक्त केले.यावेळी खिरोदा येथील शेतकरी उमेश चौधरी, रोझोदा येथील शेतकरी लीलाधर झांबरे, लखीचंद नेहेते, रुपेश हडपे, केतन इंगळे, हर्षल नेहेते, डॉ.विजय धांडे व शेतकरी उपस्थित होते. काँग्रेसचे आमदार असलेल्या शिरीष चौधरी यांच्या गावातील शेतकऱ्यांचा प्रश्न भाजपचे पदाधिकारी असलेल्या डॉ विजय धांडे यांनी मध्यस्थी करीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या माध्यमातुन सोडविला आहे.  या घटनेची तालुक्यात चर्चा सुरु होती.

Protected Content