फडणवीस खडसेंच्या घरी गेले ते बरे झाले; ते मातोश्रीवरही येतील ! : राऊत

मुंबई प्रतिनिधी । माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकनाथ खडसेंच्या घरी गेले हे बरे झाले, ते लवकरच मातोश्रीवरही येतील या शब्दात खासदार संजय राऊत यांनी या घटनेवर खोचक भाष्य केले आहे.

काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जिल्ह्याचा दौरा केला. यात ते नाथाभाऊंच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांना भेटले. राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा सुरू असून यातून फडणविसांनी बेरजेच्या राजकारणाचा संदेश दिल्याचे मानले जात आहे. यावर आज शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांचा खोचक भाष्य केले आहे.

त्यांना फडणवीस यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात विचारणा करण्यात आली. त्यावेळी संजय राऊत यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांच्या वेदना मला समजतात. माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली असे फडणवीसांना वाटते. पण फडणवीस हे माझे मित्र होते आणि राहतील. त्यामुळे मी त्यांची टीका गांभीर्याने घेत नाही. पण देवेंद्र फडणवीस शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्या घरी गेले हे पाहून चांगले वाटले. यापूर्वी मी सुद्धा एकदा लंचसाठी त्यांना भेटलोय, आता पुन्हा भेटू. देवेंद्र फडणवीस यांनी पुढील तीन-चार वर्ष विरोधी पक्षात राहून टीका करण्याचा आनंद घ्यावा. मला ते आवडेल, असे संजय राऊत यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस हे शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्या घरी गेले हे विरोध पक्ष हळूहळू जमिनीवर येत असल्याचे द्योतक आहे. एक दिवस कदाचित देवेंद्र फडणवीस मातोश्रीवरही येतील. निवडणुका आल्यावर आपण एकमेकांवर टीका करतोच, मग आता परस्परांवर विनाकारण धुरळा कशाला उडवायचा, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

Protected Content