एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर तोडगा निघण्याचे संकेत

 

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर लवकरच तोडगा निघणार असल्याचे संकेत आता मिळाले असून परिवहन मंत्री अनिल परब यांनी संघटनांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर याबाबतची माहिती दिली.

आज सह्याद्री अतिथीगृहावर परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचार्‍यांच्या शिष्टमंडळ यांच्यात बैठक पार पडली. त्यानंतर अनिल परब  म्हणाले, समितीचा अहवाल जर लवकर देता आला तर तो देण्याचा आमचा प्रयत्न राहील. समितीचा जर विलिनीकरणाबाबतचा सकारात्मक अहवाल आला, तर शासन तो मंजूर करेल. परंतु जर समितीने नकारात्मक अहवाल दिला तर काय करायचं? यावरती देखील त्यांच्याशी चर्चा झाली.

संप करणार्‍या सर्व कामगारांची मानसिकता अशी आहे, की शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळालं पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, किती त्यावरती आपण बोझा घेऊ शकतो? इतर शासकीय कर्मचार्‍यांच्या वेतनाप्रमाणे सर्व गोष्टी करायच्या असतील तर, एकंदरीत अभ्यास करून निर्णय घेण्याबाबत शासन सकारात्मक आहे. असं मी सांगितलेलं आहे. असं परब यावेळी म्हणाले.

दरम्यान, अनिल परब म्हणाले की, आमची कामगारांना एकच विनंती आहे. एखादी गोष्ट न्यायप्रविष्ठ असतान आडमुठे धोरण स्वीकारून कृपया हा संप अधिक वाढवू नये. कारण, एसटी अत्यंत नुकसानीत आहे. तिला त्यातून बाहेर काढण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला कामगारांनी देखील मदत केली पाहिजे. असं आवाहन देखील परिवहनमंत्र्यांनी केलं.

Protected Content