सुरक्षारक्षकांशी झालेल्या चकमकीत आठ नक्षलवादी ठार

नारायणपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | छत्तीसगढमधील नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमाड भागात सुरक्षा रक्षक आणि नक्षलवादी यांच्यात मोठी चकमक झाली. या चकमकीत ८ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली तर या परिसरात अद्याप पोलिसांची नक्षलवाद्यांशी चकमक सुरू असून नक्षलवाद्यांच्या मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे या अंधाधुंद गोळीबारात एसटीएफचा एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत. या परिसरात अजूनही अभियान सुरू असल्याने मारले गेलेल्या नक्षल्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

नक्षल्यांच्या गड असलेल्या अबुझमाडच्या कुतुल, फरसाबेदा, कोडामेटा परिसरात मागील २ दिवसांपासून संयुक्त नक्षलविरोधी अभियान सुरू आहे. या अभियानात नारायणपूर-कोंडागाव-कांकेर-दंतेवाडा दीआरजी, एसटीएफ आणि आयटीबीपी ५३ व्या कॉर्प्स या संयुक्त कारवाईत सामील आहेत. जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरूच असून पोलिसांच्या कारवाईला अद्याप ८ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले.

फेब्रुवारी ते मे महिन्यादरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे असे देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान नक्षलवादी कारवाई करणा-यांच्या विरोधात पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. छत्तीसगडमध्ये तब्बल ३० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने सुरक्षा दलाच्या जवानांना आणि नक्षल विरोधी मोहिमेला मोठे यश आल्याचे मानले जात आहे. ३० नक्षल्यांमध्ये १४ जहाल माओवाद्यांचा समावेश आहे. अशातच आतापर्यंत सुरक्षा दलाच्या जवानांनी वेगवेगळ््या कारवाईत अनेक नक्षल्यांचे डाव उधळून अनेकांचा खात्मा केला आहे. त्यामुळे सुरक्षा विभागाचे हे मोठे यश मानले जात आहे.

Protected Content