जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मिलिट्री बॉइज् होस्टेलजवळ ड्रेनेज पाईप फुटल्याने घाण पाणी रस्त्यावर येत होते. हा पाइप बदलण्याचे काम आज महापालिकेच्या बांधकाम विभागातर्फे करण्यात आले. ऐन रहदारीच्या वेळी हे काम करण्यात आल्याने भर उन्हात बराचवेळ वाहतूक कोंडी झाल्याने वाहनधारक हैराण झाले होते.
यावेळी आरोग्य विभागाचे मुख्य स्वच्छता निरीक्षक ए.एन. नेमाडे व एस.बी. बडगुजर तसेच बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रसाद पुराणिक हे देखील या वेळी पथकासह उपस्थित होते. जेसीबीच्या साह्याने रस्ता खोदून जुनी पाईपलाईन काढण्यात आली. यानंतर दुसरा पाइप टाकण्यात आला. यासंदर्भात अभियंता पुराणिक यांनी ही माहिती दिली. अशाप्रकारे मुख्य रस्त्यावरील दुरुस्तीची कामे ऐन रहदारीच्या वेळी न करता, मध्यरात्रीच्या सुमारास योग्य ती काळजी घेवून केली जाणे, अपेक्षित असते. मोठ-मोठ्या शहरांमध्ये अशाचप्रकारे कामे केली जात असतात. जळगाव महापालीकेनेही हा पर्याय अवलंबावा, अशी अपेक्षा सूज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.