जळगाव,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील शिवतीर्थ आणि सैनिकी वसतिगृह परिसरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सांडपाणी समस्येच्या निराकरणासाठी महानगरपालिकेने आता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात केली आहे. महापौरांनी स्वतः घटनास्थळी जाऊन कामाची पाहणी करत प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या असून, या पुढाकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठा दिलासा आणि अपेक्षांची भावना निर्माण झाली आहे.
शिवतीर्थ परिसरात वाढत्या नागरीकरणामुळे सांडपाण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. येथील जुनी भूमिगत गटार व्यवस्था अपुरी पडत असल्याने वारंवार गटारी तुंबणे, परिसरात दुर्गंधी पसरणे आणि पर्यायाने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणे अशा समस्या सातत्याने उद्भवत होत्या. ही गंभीर बाब लक्षात घेऊन जळगाव शहर महानगरपालिका प्रशासनाने या भागात मोठ्या क्षमतेची नवीन पाईप लाईन टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या कामाची प्रत्यक्ष सुरुवात आज सकाळी करण्यात आली असून महापौर दीपमाला काळे आणि नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी घटनास्थळी भेट देऊन कामाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून कामाची तांत्रिक माहिती जाणून घेतली. कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे महापौरांनी यावेळी प्रशासनाला ठणकावून सांगितले.
महापौर दीपमाला काळे यांनी हे काम पारदर्शक पद्धतीने आणि निश्चित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. कामादरम्यान नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, वाहतुकीत अडथळा निर्माण होणार नाही आणि काम दर्जेदार होईल यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणे ही प्रशासनाची जबाबदारी असून हे काम शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी देखील कामाच्या विविध तांत्रिक बाबींकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. स्थानिक नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या नवीन गटार लाईनमुळे परिसरातील स्वच्छता सुधारण्यास मोठी मदत होणार असून, भविष्यातील नागरी गरजा लक्षात घेऊन सक्षम पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.



