ठरले… सतिष आण्णा आणि देवकर आप्पा अजित पवार गटात जाणार !

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री डॉ. सतीश पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 

डॉ. सतीश पाटील यांनी स्वतः या प्रवेशाबाबत माहिती दिली. ते ३ मे रोजी मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार आहेत. अजित पवार यांच्याशी फोनवरून चर्चा झाल्यानंतर त्यांनी प्रवेशाची तारीख निश्चित केल्याचे पाटील यांनी सांगितले. “विरोधात असल्यामुळे कामे होत नाहीत, कार्यकर्त्यांचा सत्तेत जाण्याचा आग्रह होता. त्यामुळे अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला,” असे पाटील यांनी स्पष्ट केले.

“शरद पवार साहेबांशी बोलण्याची हिंमत नाही, मात्र जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांना याची कल्पना दिली आहे. शरद पवार साहेबांनी मला खूप दिलं. त्यांच्याविरोधात माझी नाराजी नाही. अजित पवारांकडे गेलो तरी शरद पवार हेच माझे दैवत असतील,” असे पाटील म्हणाले. सत्ताधारी कार्यकर्त्यांना त्रास देतात आणि कामे होत नसल्याने कार्यकर्त्यांनी सत्तेत जाण्याचा आग्रह धरल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दुसरीकडे, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनीही अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या निर्णयावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “विधानसभा निवडणुकीनंतरच मी अजित दादांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता, पण काही अडचणींमुळे तो लांबला. आता मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे आणि अजित दादांसोबतच काम करणार,” असे ते म्हणाले. गुलाबराव पाटील यांच्या विरोधाबाबत विचारले असता, देवकर म्हणाले, “प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. दुसऱ्या पक्षाच्या नेत्याने सांगितलं म्हणून दुसऱ्या पक्षाने प्रवेश थांबवावा, असं कधीच होत नाही. मी काही किरकोळ कार्यकर्ता नाही. माझंही वलय आणि महत्त्व आहे. त्यामुळे मला नाकारण्याचं कारण नाही. त्यांचा विरोध होता, कारण मी त्यांच्यासमोर निवडणूक लढवली होती. पण त्यामुळे प्रवेश थांबवता येत नाही.”

शरद पवारांची साथ सोडण्याबाबत ते म्हणाले, “निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. त्यात कार्यकर्त्यांनी सांगितलं की, दहा वर्षे विरोधात राहिलो, आता आणखी पाच वर्षे काढणं शक्य नाही. सत्ताधाऱ्यांकडून त्रास होतो, त्यामुळे सत्तेत गेलं पाहिजे. अजित दादांच्या पक्षात प्रवेश करावा, अशी कार्यकर्त्यांची भूमिका होती. तेव्हापासूनच यावर चर्चा सुरू झाली. भाजपमध्ये जाण्याचाही प्रस्ताव होता, पण माझं मन अजित दादांसोबत काम करण्यावर ठाम होतं.” महायुतीत काम करण्याबाबत विचारले असता, ते म्हणाले, “महायुतीचं जे धोरण असेल, जी सिस्टीम असेल, त्यानुसार काम करावं लागेल.”

दोन्ही नेत्यांच्या या निर्णयामुळे जळगावच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. अजित पवार गटाची ताकद वाढणार असून, शरद पवार गटाला मोठा फटका बसला आहे. भविष्यात शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील, असा विश्वासही दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव हा निर्णय घेतल्याचे दोन्ही नेत्यांनी सांगितले असले, तरी या निर्णयाचे दूरगामी परिणाम जळगावच्या राजकीय समीकरणांवर होणार आहेत.

Protected Content