विद्रोही साहित्य संमेलनात डॉ. संग्राम पाटील साधणार संवाद

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील विद्रोही साहित्य संमेलनात डॉ, संग्राम पाटील हे संवाद साधणार आहेत.अमळनेर येथील १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीच्या भूमीचे वैचारिक पेरणीने भूमिपूजन करण्यासाठी इंग्लंडस्थित सुप्रसिद्ध वक्ते, विचारवंत व सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले डॉ.संग्राम पाटील १० जानेवारीला  येत आहेत.यावेळी अमळनेर येथील वाचक, रसिक व श्रोत्यांशी काय करू आता धरूनिया भीड या विषयावर पू. साने गुरुजी ग्रंथालय  येथे संवाद साधणार आहेत.

दि. १० जानेवारी २०२४ रोजी दु.४ वाजता आर. के.  नगर समोरील धुळे रोड लगतच्या मैदानात विद्रोही साहित्य संमेलनाच्या नियोजित भूमिवर प्रतीकात्मक नांगरणी करून कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीचे भूमिपूजन डॉ. संग्राम पाटील यांचे हस्ते होणार असून यावेळी सुप्रसिद्ध उद्योगपती प्रविण साहेबराव पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील.

दरम्यान, पू.साने गुरुजी ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात सायंकाळी ५ वाजता अमळनेर येथील वाचक, रसिक व श्रोत्यांशी काय करू आता धरूनिया भीड या विषयावर संवाद  साधणारा कार्यक्रम विद्रोही मराठी साहित्य संमेलन समितीच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी अमळनेर शहरातील साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक  व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी अमळनेरकर नागरिकांनी डॉ.संग्राम पाटील यांच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विद्रोही साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content