‘कोरोना लस न घेणाऱ्यांना दाखले देऊ नका’ – गट विकास अधिकारी ज्योती कवडदेवी

जामनेर प्रतिनिधी | “तालुक्यातील ७० टक्के नागरिकांचे लसीकरण झाले असून ते १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संबंधितांनी कोरोना लसीकरण केले नसल्यास ग्रामपंचायतीने शासकीय कामासाठी लागणारे दाखले त्यांना देऊ नयेत” असे आवाहन गट विकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी अधिकाऱ्यांना केले.

जामनेर येथील पंचायत समिती हॉलमध्ये कोरोना लसीकरण १०० % पार पाडण्यासाठी ‘शालेय विभाग व एकात्मिक बाल विकास प्रकल्प’ यांच्या अधिकारी व कर्मचारी नगरसेविका यांची बैठक पंचायत समितीत पार पडली. यावेळी गट विकास अधिकारी ज्योती कवडदेवी, गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजे सोनवणे, एकात्मिक प्रकल्प अधिकारी, कक्ष अधिकारी के बी पाटील आदी उपस्थित होते.

दिनांक ४ डिसेंबर रोजी जामनेर तालुक्यात भव्य लसीकरण होणार असून एकाच दिवशी दहा हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी शालेय शिक्षण विभागाचे शाळा व्यवस्थापन समिती, अध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापक, ग्रामपंचायत, सरपंच व सदस्य अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात लसीकरण कॅम्प लावला जाणार आहे. यामुळे आता जर लसीकरण झाले असतील तर ग्रामपंचायतीतून शासकीय कामासाठी लागणारे दाखले दिले जाणार आहे. अन्यथा दाखले मिळणार नाही अशा सूचना गटविकास अधिकारी कवडे यांनी बैठकीदरम्यान दिले आहे.

जर आपल्याला कोरोना आजाराला पूर्ण हरवायचे असेल तर १०० टक्के लसीकरण गरजेचे आहे. लसीकरण झाले असेल तर त्याची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. जामनेर तालुक्यात ७० टक्के लसीकरण झाले असून ते १०० टक्के पूर्ण करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने काम करावे” असे आवाहन यावेळी गटविकास अधिकारी यांनी केले

Protected Content