‘तो’ अपघात नव्हे तर घातपात : गुन्हा दाखल करण्याची आप्तांची मागणी

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील अतुलकुमार किसन भावसार यांचा मृत्यू अपघातात झाला नसून त्यांचा घातपात झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, फैजपूर येथील रथगल्लीतील रहिवासी अतुलकुमार किसन भावसार यांचा ३० जुलै २०२२ रोजी रात्री सुमारे साडेआठ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा फाट्याजवळ असलेल्या हॉटेल गितांजली जवळ अपघात झाला होता. त्यांना परिसरातील नागरिकांनी रूग्णालयात दाखल केले होते. यानंतर जळगावच्या खासगी रूग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना मुंबईतील रूग्णालया दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असतांना १० ऑगस्ट २०२२ रोजी त्यांचा मृत्यू झाला होता.

यानंतर दुसर्‍या दिवशी कूपर हॉस्पीटरमधून अतुलकुमार भावसार यांच्या पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट आल्यानंतर यात त्यांचा मृत्यू हा अपघाताने झाला नसून त्यांचा घातपात झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, यामुळे संबंधीत अपघात करणारा व्यक्ती राजेंद्र त्र्यंबक पाटील (रा. वढवे, ता. मुक्ताईनगर) याने त्याच्या एमएच१९ सीयू 6333 या क्रमांकाच्या इनोव्हा कारने अतुलकुमार भावसार यांचा मृत्यू घडवून आणत पळ काढल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

तसेच राजेंद्र पाटील हा फिर्याद मागे घेण्यासाठी दबाव टाकत असून त्याच्यावर भादंवि कलम-३०४ अनुसार गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन पूनम अतुलकुमार भावसार, अमित किसन भावसार आणि परिसरातील नागरिकांनी उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांना दिले आहे.

Protected Content