जळगाव प्रतिनिधी । शेतात पाणी भरून येतो असे सांगून गेलेल्या तरूणाचा रेल्वे रूळावर संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, बंटी उर्फ दिपक बापू पाटील (वय-22) रा. धानोरा, मोहाडी ता.जि. जळगाव हा शेतीचे काम करतो. रविवारी रात्री 8 ते 8.30 वाजेच्या सुमारास जेवन करून शेतात भरणा करण्यासाठी जातो असे सांगून घराबाहेर पडला. रात्री भरणा करून घरी न आल्याने घरातील आई-वडील आणि भावांना चिंता वाटली. वडील बापू गंगाधर पाटील आणि लहान भाऊ हर्षल बापू पाटील यांनी रात्री धानोरा शिवारातील शेतात जावून पाहणी केली मात्र मिळाला नाही. त्यानंतर वडील आणि लहान भाऊ यांनी शेतापासून जवळ असलेल्या रेल्वे रूळावर पाहणी केली असता रात्री 10.30 वाजत रेल्वे रूळावर मृतदेह आढळून आला. दरम्यान, आत्महत्या की वेगळे कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अत्यंत साधा व मनमिळावू स्वभाव असल्यामुळे गावात चांगला परिचित होता. दरम्यान, आज मुलगी पाहण्यासाठी कुटुंबासोबत बाहेरगावी जाणार होता. मयताच्या पश्चात आई सुरेखा, वडील बापू पाटील, लहान भाऊ हर्षल आणि विवाहित बहिण असा परीवार आहे.