युतीची आज संध्याकाळी घोषणा : संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) भाजप अध्यक्ष अमित शाह आज संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहेत. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते युतीची घोषणा करतील, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप यांच्या युतीची बोलणी पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी २३-२५ आणि विधानसभा निवडणुकीसाठी ५०-५० टक्क्यांचा फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या युतीच्या चर्चेला आज पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
त्या पार्श्वभूमीवर खा. राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले की, “अमित शाह आज संध्याकाळी ‘मातोश्री’वर येणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस असतील. यानंतर ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. मग दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होईल. युतीचे जे काही फॉर्म्युले आहेत, त्याबाबत दोन्ही प्रमुख नेते घोषणा करतील. त्यानंतर राज्यात ‘अब की बार उद्धव सरकार’, अशी सूचक घोषणाच राऊत यांनी यावेळी केली.
भाजप-शिवसेना युतीची बोलणी पूर्ण – युती व्हावी यासाठी भाजपने एक पाऊल मागे घेतलं आहे. भाजपने मित्रपक्ष शिवसेनेसाठी अडून बसलेल्या पालघरच्या जागेवरही पाणी सोडलं आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसंच विधानसभेसाठी शिवसेनेची ५०-५० टक्के जागांच्या फॉर्म्युलाची मागणीही मान्य झाल्याचं कळतं आहे. त्यानुसार शिवसेना-भाजप विधानसभेची निवडणूक प्रत्येकी १४४-१४४ जागांवर लढणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपमध्ये युती होणार की नाही? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. शिवसेनेने गेल्या काही महिन्यांपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. भाजपवर टीका करण्याची एकही संधी शिवसेनेच्या नेत्यांची सोडली नव्हती. याच भूमिकेचा शिवसेनेला फायदा मिळाल्याचं दिसून येत आहे.

Add Comment

Protected Content