चाकू हल्लाप्रकरणी दोघांना दोन वर्षाचा सश्रम कारावास

जळगाव प्रतिनिधी । दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारल्याचा राग येऊन एकावर चाकू हल्ला झाला होता. याप्रकरणात दोन भावांना शुक्रवारी न्यायालयाने दोषी धरून २ वर्ष सश्रम कारावासाच्या शिक्षेसह २५ हजार रूपयांचा दंड प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी.एस. सानप यांनी ठोठावला.

बालाजी पेठेतील संतोष भगवान पाटील (रा़ बालाजी पेठ) यांच्यावर हे २ जानेवारी २०१४ रोजी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास दुध फेडरेशनमार्गे पाळधी येथील मंदिरात दर्शनासाठी जात होते़ त्यावेळी आरोपी मनोज उर्फ मन्या रामचंद्र सपकाळे व राहुल उर्फ बबलू रामचंद्र सपकाळे (रा. शनिपेठ) दोघे भाऊ दुचाकीवरून जात असताना त्यांनी संतोष पाटील यांना कट मारला़ पाटील यांनी लागलीच दोघांना दुचाकी सावकाश चालवा असे सांगितले. याचा राग येऊन दोघांनी त्यांना मारहाण छातीवर आणि पोटावर चाकूने वार केले़ हा प्रकार रस्त्यातील ये-जा करणाऱ्‍यांनी पाहताच त्यांनी दोघांच्या हातातून पाटील यांची सुटका केली होती़ नंतर त्यांच्या फिर्यादीवरून दोन्ही भावांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सात साक्षीदार तपासले
दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर खटला हा न्यायालयात सुरू झाला़ यात सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. नीलेश चौधरी यांनी ७ साक्षीदार तपासले़ त्यामध्ये वैद्यकी अधिकारी डॉ़ राहुल निकम, फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी व तपासी अधिकारी सार्थक नेहते यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या़ विशेष बाब म्हणजे गुन्ह्यातील हत्यार हे जप्त करण्यात आलेले नव्हते़ मात्र, अ‍ॅड.नीलेश चौधरी यांनी गुन्हा सिद्धीसाठी हत्याराची आवश्यकता नसल्याबाबतचा जोरदार युक्तीवाद केला़ हा युक्तीवाद न्यायाधीश जी़ए़सानप यांनी ग्राह्य धरून मनोज आणि राहूल या दोघांना दोषी ठरविले. नंतर शुक्रवारी न्या़ सानप यांनी मनोज सपकाळे आणि राहुल सपकाळे या भावांना २ वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा व २५ हजार रूपयांची शिक्षा सुनावली.

Add Comment

Protected Content