शिरसाळ्यातील पाणी पुरवठा योजनेत ‘झोल’ : सहा टाक्या असूनही पाण्याचा थेंब नाही !

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील शिरसाळा येथे पाणी पुरवठा करण्यासाठी सहा टाक्या बांधल्या असल्या तरी एकात देखील पाण्याचा थेंब नसून येथील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.

बोदवड तालुक्यातील शिरसाळा हे गाव पूर्ण महाराष्ट्रात मारुती मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या गावामध्ये महाराष्ट्रातून लोक दर्शनासाठी ये-जा करीत असतात त्यामुळे हे गाव सर्वत्र शिरसाळा ( मारोती ) म्हणून नावाजलेले आहे. येथेे पिण्याचे पाणी लोकांना मिळावे यासाठी सहा टाक्या वेगवेगळ्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या आहेत. परंतु एकही टाकीमध्ये एक थेंब पाण्याचा अद्याप पर्यंत पोहोचलेला नाही. तरीसुद्धा नवीन ४० ते ४२ लाख रुपयाची जल जीवन योजनेअंतर्गत पाईपलाईनचे काम घाईघाईने सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

शिरसाळा गावाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या गावांमध्ये पूर्वी भारत निर्माण योजना होऊन गेलेली आहे. त्या अंतर्गत संपूर्ण गावांमध्ये पाईपलाईन केली गेलेली होती. परंतु ज्या विहिरीवरून वा कुपननलिकेवरून या टाक्यांमध्ये पाणी पोहोचायचे होते. त्या टाक्यांमध्ये एक थेंबही पाणी अद्याप पर्यंत पोहोचलेले नाही. त्यामुळे गावामध्ये या सहा टाक्या असून नसल्यासारख्या आहेत. एवढी मोठी योजना राबवून देखील जर त्या टाक्यांमध्ये पाणी पोहोचू शकले नाही. तर या गावांमध्ये परत जलजीवन योजना मंजूर केली कशी ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. आणि ज्या विहिरीवरून पाणी टाकीत पोहोचवले जाते.त्या विहिरीला पाणी आहे किंवा ओडिओ योजनेद्वारे जे पाणी टाकीत टाकले जाते.तिथपर्यंत पाणी पोहोचतच नाही. मग परत नवीन पाईपलाईन करून काय फायदा ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, शिरसाळा गावांमध्ये जलजीवन योजनेअंतर्गत अंदाजे ४० ते ४२ लाख रुपयाची योजनाचे काम घाईघाईने ठेकेदार करीत असल्याचे दिसत आहे. कामा संदर्भात कोणतेही बोर्ड लावलेले नाही. सरपंचांना माहिती विचारली असता सरपंचांना याबाबत कोणती कल्पना नाही. वास्तविक पाईपलाईन करतांना पाईपलाईनच्या खाली कॉंक्रीटकरण करायला हवे व वरून सुद्धा कॉंक्रीट टाकायला हवे.परंतु नुसत्या चार्‍या खोदून त्यात घाईघाईने पाईपलाईन टाकले जात आहे.

गावात नवीन बनवले रस्त्यांची तीन तेरा वाजता ना दिसत आहे .जेणेकरून थुंकीला थुंकी लावून पाईपलाईनचे काम दाखवायचे आणि शासनाचा पैसा गडप करायचा या हेतूनेच या योजनेचे काम अद्याप पर्यंत ठेकेदारांनी केलेले आहे. आणि आता सुद्धा करीत आहे. त्यामुळे संबंधित जलसिंचन विभागाने तथा संबंधित अधिकार्‍यांनी स्वतः उभे राहून हे काम योग्यरीत्या करून घ्यावे व आता तरी त्या सहा टाक्यांमध्ये पाणी पोहोचेल याची खात्री करावी. तेव्हाच पैसे काढावे अन्यथा काढू नये अशी मागणी ही जनतेकडून केली जात आहे.

Protected Content