मुंबई, वृत्तसंस्था | राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासूनच कुरबुरी सुरु आहेत. सरकारमधील मंत्री बंगल्यांचे वाटप आणि खात्यांवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वेठीला धरत आहेत. या प्रकारावरुन काँग्रेसचे नेवाशाचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्रास देऊन राजीनामा देण्यास भाग पाडले जाईल, असे गडाख यांनी म्हटले आहे.
गडाख म्हणाले, “जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री सरकारी बंगल्यांच्या आणि खात्यांच्या वाटपावरुन सातत्याने सरकारच्या कमात अडथळा आणत असतील तर अशाप्रकारे त्रास देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आपल्यापदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले जाईल.”
महाविकास आघाडीच्या सरकारमधील काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवर यांना ‘इतर मागास वर्ग, समाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप पुनर्वसन’ ही खाती देण्यात आली होती. मात्र, चांगले खाते मिळाले नाही, म्हणून गेले सहा दिवस रुसून बसलेल्या मंत्री विजय वडेट्टीवार यांना मदत व पुनर्वसन हे आणखी एक खाते देऊन त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे. वडेट्टीवार यांनी शुक्रवारी खात्यांचा कार्यभार स्वीकारला. वडेट्टीवार यांचा रुसवा काढण्याच्या निमित्ताने शिवसेनेकडील आणखी एक खाते पदरात पाडून घेण्यात काँग्रेसला यश आले आहे.