बुलडाणा जिल्ह्यातील रखडलेल्या पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री

बुलढाणा प्रतिनिधी । जिल्ह्यात ११५ पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू असून ज्या योजना ५ ते १० वर्षे व  १० वर्षांपेक्षा जास्त काळ रखडलेल्या आहेत. त्या पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण कराव्यात, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्रजी शिंगणेसाहेब यांच्या पुढाकारातून मंत्रालयात बुलडाणा जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला यावेळी ते बोलत होते.

9 पाणीपुरवठा योजनांना मंजुरी

जिल्ह्यात 27  पाणीपुरवठा योजना दरडोई खर्चापेक्षा जास्त असल्यामुळे शासनाकडे मान्यतेस्तव सादर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 9 योजनांना मंजुरी देण्यात आली असून उर्वरित योजनांना सुद्धा तपासणी करून मंजुरी देण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

जलजीवन मिशनचा आढावा

पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील जलजीवन मिशनचा आढावा घेतला. जलजीवन मिशनचा सुधारित आराखडा त्वरित सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. बुलडाणा शहर व चार गावांचे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतचे काम मार्च 2021 पर्यंत पूर्ण करून योजना कार्यान्वित करावी तसेच देऊळगाव राजा नगरपालिकेच्या वितरण व्यवस्थेचा सविस्तर प्रकल्प अहवाल त्वरित तयार करुन शासनास सादर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर आणि पाणीपुरवठा विभाग अमरावती येथील मुख्य अभियंता श्रीमती मनिषा पलांडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता शशिकांत फापाळे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता दिनकर घुगे  व अन्य अधिकारी उपस्थित होते.

 

Protected Content