थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नाशिक महसूल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी धरणगाव तालुक्यातील बांभुरी बुद्रुक येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जात थेट संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विभागीय आयुक्तांच्याहस्ते एका शेतकऱ्यांच्या कापूस पिकाची ई-पीक पाहणी ही करण्यात आली.

 

बांभुरी बुद्रुक येथील रघुनाथ साहेबराव पाटील या शेतकऱ्यांच्या गट नंबर-३३३ वरील कापूस पिकांची ई-पीक पाहणी विभागीय आयुक्तांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर गावातील शेतकऱ्यांची शिवार रस्त्यावर बैठक घेण्यात आली. यात शेतकऱ्यांच्या महसूल विषयक विविध अडचणी, प्रलंबीत प्रकरणांची माहिती जाणून घेत‌ या प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले.

 

सातबारा उताऱ्यावरून पोटखराब क्षेत्र वगळले का  ? एक रूपयात पीक विमा योजनेचा अर्ज भरला का ? ई-पीक पाहणी करून घेतले का ? आदी प्रश्न विचारत विभागीय आयुक्तांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या.  पीक विमा व ई-पीक पाहणीत गावात शंभर टक्के कामे झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

 

महसूल प्रशासनाच्या कामाबद्दल आपण समाधानी आहात का ? या प्रश्नांवर शेतकरी म्हणाले, महसूल प्रशासनाकडून आमचे महसूल विषयक कामे तसेच कागदपत्रांची कामे वेळेवर होत असतात. महसूल विभागाच्या कामाबद्दल आम्ही समाधानी आहोत.

 

कापूस फवारणी करतांना विषारी औषधांपासून स्वतःचा बचाव करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शेतकऱ्यांना केले. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन आदी उपस्थित होते.

Protected Content