चोपडा (प्रतिनिधी) राज्यात ,देशात सरकार हे शेतकरी, रोजगारी, यांच्यासह सर्व सामान्य माणसाच्या विरोधातील हे सरकार आहे. माझ्या मते सामान्य नागरिकांचे वैरी असे सरकार असल्यामुळे हे सरकार उलथवून लावा. हुकूमशहा वाटचालीकडे जाणारे राज्य वाचवण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सगळ्यांची आहे. त्यामुळे एकत्र या आणि पुन्हा रयतेच राज्य आणा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य विधान सभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी वरडी गावात आयोजित छोटेखानी सभेत केले.
विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून चोपडा तालुका विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने घरा-घरात प्रचार आणि मना मनात घर असे प्रचारसूत्र वापरले आहे. यावेळी विधानसभेचे संभाव्य उमेदवार जगदीशभाऊ वळवी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, माझ्या उमेदवारी बद्दल अनेकांना शंका असेल. पण मी सांगतो माझा नारळ गोटा झाला आहे. भाईसाहेब त्याला साक्षी आहेत. फक्त अधिकृत घोषणा होणे बाकी आहे, ते ही लवकरच होईल. मी आमदार असतांना पाच वर्ष हात जोडून कामे केलीत हे तमाम जनतेने अनुभवले आहे. मागची पाच वर्षे कशी गेली ते सुद्घा तुम्हीच अनुभवले आहे. तुमच्या आशीर्वादाने पुन्हा निवडून आलो, तर पाणी सिंचन,पाणी अडवा पाणी जिरवा लघु पाट बंधारे,केटीवेअर याच कामांना प्राधान्य दिले जाईल,असे प्रामाणिक मत जगदीशभाऊ यांनी मांडले.
यावेळी चोसाका माजी चेअरमन घनश्यामअण्णा पाटील,रायुकॉ जिल्हा अध्यक्ष रवींद्र पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी वरडी गावात वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत पाच शाखांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प स माजी सभापती विनायक पाटील, मा जि प सदस्य बाळासाहेब पाटील, लहुश धनगर,तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, डॉ कांतीलाल पाटील,व ग्रामस्थ मोठया प्रमाणावर हजर होते. यावेळी बोलतांना वर्डी गावचे रहिवासी व अरुणभाई गुजराथी यांचे खंदे समर्थक बाळासाहेब पाटील यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.