बाप रे : तिघांच्या अश्‍लील चाळ्यांना कंटाळून तरूणीची आत्महत्या

चाळीसगाव प्रतिनिधी । तीन तरूण सातत्याने अश्‍लील चाळे करून त्रास देत असल्याने तालुक्यातील खेरडे येतील युवतीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, गेल्या पंधरा दिवसांपासून घरासमोर येऊन अश्‍लील चाळे करून एका मुलीला त्रास दिला जात असल्याने सदर मुलीने त्रासाला कंटाळून विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील खेरडे (सोनगाव) येथे घडली असून याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

चाळीसगाव तालुक्यातील खेरडे (सोनगाव) येथे एका मुलीला विशाल एकनाथ जाधव, विलास पुरणदास चव्हाण व पप्पू चरणदास चव्हाण (सर्व रा. खेरडे सोनगाव) हे तीन तरूण हे गेल्या पंधरा दिवसांपासून अश्‍लील चाळे करून शारीरिक व मानसिक छळवणूक करत होते. रविवार दिनांक १८ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास  या तिघांनी सदर मुलीच्या घरासमोर उभे राहून हातवारे करत इशारा केला. 

यामुळे मुलीने या त्रासाला कंटाळून हे विषारी औषध प्राशन केले. तिला अत्यवस्थ अवस्थेत रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिची प्राणज्योत मालवली. याबाबत गोरख चना राठोड (वय-४९) रा. खेरडे (सोनगाव) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०५ नुसार आज दुपारी वरील आरोपी तीघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संपत अहिरे हे करीत आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलिसांनी या तिन्ही तरूणांचा शोध सुरू केला आहे.

Protected Content