चाळीसगाव प्रतिनिधी । येथील लोकनायक स्व. महिंद्रसिंग राजपूत यांच्या सातव्या पुण्यस्मरणार्थ राष्ट्रीय कन्या विद्यालयातील गरजू 42 विद्यार्थीनींना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी माजी प्राचार्या साधना बारवकर या अध्यक्षपदी उपस्थित होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, तात्यांच्या सामाजिक कार्याचा परिचय द्यावा तेवढा थोडाच आहे. आधी केले मग सांगितले. साधी रहाणी उच्च विचारसरणी हा त्यांचा गुण खरच आजच्या नेत्यांनी घेण्यासारखा आहे. त्यांच्यावर विनोबा भावे, गाडगे बाबा यांच्या विचारांचा खूप पगडा होता. त्यांच्या जन कल्याणकारी कार्यामुळे लोकनायक अशी पदवी बहाल करण्यात आली. ‘मरावे परी किर्ती रूपी उरावे’ या उक्तीप्रमाणे तात्यांचा मरणोत्तर देहदानाचा निर्णय सगळ्यांना आदर्श ठरणारा असा होता. आज त्यांच्या या पुण्यसमरणी त्यांचे चिरंजीव यांनी त्यांचा हाच आदर्श ठेऊन त्यांचे कार्य पुढे चालवले आहे. असे देखील त्यांनी मनोगतात व्यक्त केले.
उपप्राचार्या कुसमावती पाटील, पर्यवेक्षक संजय जाट, सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिता पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर याप्रसंगी तात्यासाहेबांविषयी सतीश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रणजित राजपूत, शिक्षक संजय देशमुख, श्री.शेलार, विजय राखुंडे, विनोद नेवरे, उद्धव चव्हाण, राहुल देवकर, प्रदिप वाबळे, प्रशांत गायकवाड, अतुल चव्हाण, गणेश फरतरे, वंदना निकम, आशा वाबळे, उज्वला देशमुख, अभंग व सर्व शिक्षक बंधु भगिनी व शिक्षकेतर बंधु भगिनी यांनी कार्यक्रमासाठी अनमोल सहकार्य केले.