चाळीसगाव शहरात पुराचे पाणी शिरले

चाळीसगाव प्रतिनिधी | तितूर आणि डोंगरी नद्यांना मोठा पूर आला असून यामुळे शहराच्या काही भागांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

याबाबत वृत्त असे की, काल सायंकाळपासून उगमस्थळांवर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे तितूर आणि डोंगरी नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. यामुळे शहराच्या मध्यावरून गेलेल्या तितूर नदीचे पाणी परिसरात शिरले. रात्री उशीरापासून पुराचे पाणी आल्याने परिसरातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला आहे. आज सकाळी सुध्दा पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरले. तसेच बाजारपेठेतही पाणी शिरल्याची माहिती आहे.

दरम्यान, तितूर आणि डोंगरी नदीला आलेल्या पुरामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तर गिरणा काठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळेच कन्नड घाटामध्ये दरड कोसळली असून यामुळे रात्रीपासून या महामार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे. आता देखील पाऊस सुरू असल्याने रस्ता दुरूस्त करण्यात अडचणी येत आहेत. यामुळे या मार्गावरून जाण्याचे नियोजन करणार्‍यांनी दखल घेण्याचे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे.

Protected Content