भुसावळात मध्यरात्री कार चालकावर चाकूहल्ला : तिघांना अटक

bhusaval halla

भुसावळ, प्रतिनिधी| रस्त्यात चारचाकी आडवी लावली याचा राग आल्याच्या कारणावरून चारचाकी चालकावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना काल मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास नाहाटा महाविद्यालयाजवळील जलकुंभाजवळ घडली. या प्रकारामुळे परिसरातील खळबळ उडाली होती.

 

सतीश बाविस्कर हे महामार्गाच्या कामासाठी लावण्यात आलेल्या चारचाकी वाहनावर चालक म्हणून कामास आहेत. मंगळवारी रात्री अभियंता मनोज जैस्वाल यांना त्याने नाहाटा महाविद्यालयाजवळ सोडल्यानंतर वाहन (एम.एच.२८ व्ही.०७३९) महेश नगराकडे जाणार्‍या रस्त्यावर लावल्यानंतर काही वेळात फोर्ड कंपनीच्या चारचाकीतून (एम.एच.०६ ए.एन.७८४४) आलेल्या तिघा संशयीतांनी त्यांच्याशी वाद घालत त्यांच्या पोटात चाकू मारून पळ काढला. या घटनेनंतर या परीसरात प्रचंड खळबळ उडाली होती.

पोलिसांनी जखमी सतीश बाविस्कर (वय ४३) रा. काशिनाथ नगर यांना गोदावरी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांनी आरोपींना अटक करण्याच्या सूचना केल्यानंतर याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी आरोपी योगेश देविदास तायडे (रा. महेश नगर), तुषार शंकर जाधव व मंगेश अंबादास काळे (कृष्णनगर, भुसावळ) यांना अटक केली आहे. गुन्ह्यात वापरलेली चारचाकीही जप्त करण्यात आली आहे. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रावसाहेब किर्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील जोशी, उमाकांत पाटील, ईश्‍वर भालेराव, रमण सुरळकर, सचिन पोळ आदींनी आरोपींना त्वरित ताब्यात घेतले असून भाग ५, गुरनं ४५५/१९, भा.दं.वि कलम ३०७,३२३,५०४,५०६ व ३४ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Protected Content