जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा झाला.
कार्यक्रमाची सुरुवात आणि मान्यवरांची उपस्थिती:
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे सर, उपमुख्याध्यापक संजय भारुळे सर, ज्येष्ठ पर्यवेक्षक प्रशांत जगताप सर, संजय वानखेडे सर, ज्येष्ठ शिक्षिका आशा कुलकर्णी, पद्मजा जोशी, सुभाष पाटील, मराठी विभाग प्रमुख रेवती किन्हीकर या मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वती, कवीवर्य कुसुमाग्रज, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. श्रीमती. संपदा छापेकर यांनी प्रास्ताविकातून मराठी भाषेचे महत्त्व, कुसुमाग्रज यांचे मौलिक कार्य याबद्दल माहिती सांगितली.
विद्यार्थ्यांचे कलाविष्कार आणि मनोगत:
याप्रसंगी शाळेच्या दुपार विभागातील केशव मराठे, ध्रुव वाघ, जय जैनकार, हर्षदा महाजन या विद्यार्थ्यांनी मराठी विषयातील पाठ्यांश घटकावर अभिवाचन सादर केले. तसेच मराठी भाषेविषयी, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी देवेश चांदलीकर याने मनोगत व्यक्त केले. सकाळ विभागातील संजीवनी मराठे लिखित “माय मराठी” कविता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी समूहात, तर “मी कसे व्हावे” ही साने गुरुजींची कविता प्रथमेश माळी याने वैयक्तिक सादर केली. “ही मायभूमी ही जन्मभूमी ही मायमराठी आमची”, “जय महाराष्ट्र, जय निनादती चौघडे” ही गीते सकाळ विभागातील विद्यार्थ्यांनी उत्तमपणे सादर केली. त्यांना श्रीमती संपदा छापेकर, उल्हास ठाकरे, विद्यार्थी रुद्र सोनवणे यांनी ढोलकी व तबल्यावर साथसंगत केली. विद्यार्थिनींनी “गौरव महाराष्ट्राचा”, “ही मायभूमी, जन्मभूमी” या गीतांवर समूहनृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांना श्रीमती नीलिमा सपकाळे यांनी मार्गदर्शन केले. सोमनाथ महाजन सरांनी विद्यार्थ्यांकडून एक बालकविता कृतीयुक्त म्हणवून घेतली.
मान्यवरांचे मार्गदर्शन आणि आभार प्रदर्शन:
याप्रसंगी उपमुख्याध्यापक संजय भारुळे यांनी कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करून व्यवहारात जास्तीत जास्त मराठी भाषा वापरण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा वानखेडे यांनी, तर आभार प्रदर्शन रूपाली महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीता पानट, उमेश ढाकणे, उल्हास ठाकरे, किशोर माळी, अशोक भालेराव, मोहन डांबरे, अडकमोल, संगणक विभाग तसेच इतर शिक्षक, शिक्षकेतर बंधू-भगिनी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् गीताने करण्यात आली.