रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर शहरात सामाजिक ऐक्य टिकवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. सध्या सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात असून, त्याच्या प्रभावाला बळी न पडता कायद्याच्या चौकटीत राहून शांतता आणि सुव्यवस्था जपली पाहिजे. युवकांनी बाहेरच्या नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी शहराच्या सौहार्दासाठी एकोप्याने राहावे, असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी केले.
रावेर पोलिस स्टेशनतर्फे सर्वधर्म समभाव आणि सामाजिक ऐक्याच्या उद्देशाने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. शहीद अब्दुल हमीद (नागझिरी) चौकात पार पडलेल्या या कार्यक्रमाला शहरातील विविध सामाजिक, राजकीय आणि धार्मिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे होते, तर प्रमुख उपस्थितींमध्ये पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, सहायक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव, पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे, माजी नगराध्यक्ष हरिष गनवानी, डॉ. संदीप पाटील, महेमुद शेख, अशोक शिंदे, नितिन पाटील, अरुण शिंदे, संतोष पाटील, माजी नगरसेवक आसिफ मेंबर, तसेच मौलाना नजर अहमद, मौलाना शकील खान, ग्यासुद्दीन काझी आणि अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
अप्पर पोलिस अधीक्षक नखाते म्हणाले की, “रावेर शहराने नेहमीच धार्मिक सलोखा जपला आहे. सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन शहराच्या शांततेसाठी योगदान दिले पाहिजे. समाजमाध्यमांवरील अफवांना बळी न पडता, कायद्याचे पालन करणे आणि प्रशासनाला सहकार्य करणे महत्त्वाचे आहे.” या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवणारा हा उपक्रम शहराच्या सलोख्यासाठी सकारात्मक पाऊल ठरला. समाजातील विविध घटकांनी एकत्र येत परस्पर सन्मान आणि सौहार्द राखण्याचा संदेश दिला.