दुचाकींना बसने उडविले; दोन ठार, तीन जखमी

जळगाव प्रतिनिधी । इएसआयसीच्या कामासाठी जळगावला आल्यानंतर परत आपल्या घरी परतणार्‍या दोन दुचाकीस्वारांना भरधाव वेगाने धावणार्‍या बसने दिलेल्या धडकेत दोन जण ठार झाले असून तीन किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात आज दुपारी कुसुंब्याजवळ घडला.

याबाबत वृत्त असे की, चिंचखेडा ता. जामनेर येथील रहिवासी लिलाबाई धोंडू सोनार यांना मुतखड्याचा त्रास होत होता. यामुळे त्यांचा मुलगा बाळू धोंडू सोनार याने जळगाव येथील इएसआयसीच्या कार्यालयात येण्याचे ठरविले. यानुसार आज तो आपला मित्र गजानन व पत्नी आणि मुलासह आज जळगावला आला होता. येथील काम आटोपून दुपारी तीन वाजेच्या सुमारास हे सर्व जण दोन दुचाकींवरून घरी परत निघाले होते.

दरम्यान, कुसुंबा गावाजवळ जळगाव-सोयगाव या भरधाव वेगाने धावणार्‍या बसने या दोन्ही दुचाकींना धडक दिली. यामध्ये एका दुचाकीवर स्वार असणारे लिलाबाई धोंडू सोनार (वय५५) आणि गजानन किसन बावस्कर ( वय ३२ चिंचखेडा ता. जामनेर) हे जागीच ठार झाले. तर दुसर्‍या दुचाकीलाही बसने धडक दिली. यात बाळू धोंडू सोनार, त्यांची पत्नी सुनीता आणि योगेश हे किरकोळ जखमी झाले. त्यांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह सिव्हील हॉस्पीटलला पाठविण्यात आले आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

Protected Content