जिल्हा प्रशासनाला दिले विविध मागण्यांचे निवेदन
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान व फळ पिक विम्याची नुकसान भरपाई तात्काळ देण्याच्या मागणीसाठी बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येवून मागणीचे निवेदन देण्यात आले.
राज्य शासनाने सन २०२०-२१ मध्ये महात्मा फुले कर्जमाफी योजना जाहीर करून थकबाकीदार शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले होते. मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहन अनुदान देण्यात आले नसून पिक विम्याची ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नसल्याने या निषेधार्थ सोमवारी ८ ऑक्टोबर रोजी जळगाव येथे भारत राष्ट्रसभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ प्रोत्साहन अनुदान द्यावे व फळ विम्याची नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी अशी मागणी भारत राष्ट्र समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारत राष्ट्र समितीच्या वतीने देण्यात आला आहे.