
धरणगाव/जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव येथील महावितरण कार्यालयात ठेकेदारी पद्धतीने ‘झिरो वायरमन’ म्हणून काम करणाऱ्या एका ३६ वर्षीय तरुणाचा इलेक्ट्रिक खांब्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली आहे. कामावर असताना झालेल्या या अपघातामुळे दिलीप देवा भिल (वय ३६, रा. गारखेडा, ता. धरणगाव) या तरुणाला आपला जीव गमवावा लागला.
नेमकी घटना काय घडली?
प्राप्त माहितीनुसार, दिलीप भिल हा गेल्या १० वर्षांपासून धरणगाव येथील महावितरण कार्यालयात ठेकेदारी तत्वावर ‘झिरो वायरमन’ म्हणून कार्यरत होता. तो आपल्या आई-वडील, पत्नी आणि दोन मुलांसह गारखेडा गावात राहत होता. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी तो महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबत धरणगाव शहरातील लोहार गल्ली परिसरामध्ये इलेक्ट्रिक खांब्यावर काम करण्यासाठी गेला होता.
सकाळच्या सुमारास, सुमारे ९ वाजता दिलीप भिल खांब्यावर चढून काम करत असताना, अचानक तो जमिनीवर कोसळला. (नेमका ईलेक्टीक शॉक लागला किंवा तोल जावून पडला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.) खांब्यावरून पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ उचलून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती दिलीप याला मृत घोषित केले.
कुटुंबीयांचा आक्रोश आणि संघटनेचा इशारा
या अपघाताची माहिती मिळताच दिलीपच्या आई-वडील, पत्नी आणि नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घेतली. आपल्या तरुण मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच आईने केलेला मन हेलावून टाकणारा आक्रोश उपस्थितांचे डोळे पाणावणारा होता.
दरम्यान, दिलीप भिल हा कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ असल्याने आणि कामावर असताना अपघात झाल्याने, मयत तरुणाच्या कुटुंबीयांना महावितरणकडून भरीव आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी एकलव्य संघटनेने केली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही आणि ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत दिलीपचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. या संदर्भात धरणगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.



