ब्रेकींग : धावत्या रेल्वेखाली तरूणाने संपविली जीवनयात्रा; नातेवाईकांचा आक्रोश !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आनंद मंगल सोसायटी पिंप्राळा परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय तरूणाने धावत्या रेल्वेखाली येवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अभिषेक सुभाष राठोड (वय-२२) रा. आनंद मंगल सोसायटी, पिंप्राळा असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील पिंप्राळा भागात अभिषेक राठोड हा तरूण आईवडील आणि मोठा भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होता. तो मुंबईतील एका लॉ महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत होता. दुचाकी अपघात झाल्याने गेल्या दीड महिन्यांपासून तो जळगावात राहत होता.  मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अभिषेक याने आशाबाबा नगर येथे धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.

घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून पंचनामा केला. त्याच्या जवळील मोबाईलच्या आधारे ओळख पटली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. एकीकडे दसरा निमित्त घरात आनंदाचे वातावरण असतांना मुलाने आत्महत्या केल्याचे राठोड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास पोहेकॉ जितेंद्र तावडे करीत आहे. अभिषेक हा पोलीस मुख्यालयातील कंट्रोल रूममध्ये कार्यरत असलेले सुभाष राठोड यांचा मुलगा होता.  मयताच्या पश्चात आई किर्ती, वडील सुभाष राठोड, मोठा भाऊ आकाश असा परिवार आहे.

 

Protected Content