भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करतेय – जयंत पाटील

मुंबई प्रतिनिधी । एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून जाऊन भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करत चुकीच्या पध्दतीने अडकवत आहेत. मात्र एकनाथ खडसे हे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही त्यामुळे चौकशीतून ते बाहेर येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची ईडीने चौकशी सुरू केल्यानंतर जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांच्याविरोधात हे कुभांड रचले जात असल्याचा आरोप केला आहे.

एकनाथ खडसे यांच्यावर ज्या विषयावर कारवाई सुरू आहे त्यात तथ्य अद्याप आढळलेले नाही. किंवा कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाही. एक जागा त्यांनी रितसर घेतली त्याबाबत निर्णय झालेला आहे. चौकशी समितीलाही त्यात काही चूक आढळली नाही. पण त्यामध्ये कुभांड रचून या सर्व एजन्सीमार्फत राजकीयदृष्टया अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

भाजपचा एकनाथ खडसे या ओबीसी नेत्यावर फार जुना राग आहे. एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये फार वाढू दिले गेले नाही. ओबीसी नेतृत्वाला बाजुला करण्यात आले असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला आहे.

Protected Content