भाजप कार्यकर्ते पूरग्रस्तांचे पैसे लाटतायत ; हाती दांडके घेण्याचा राजू शेट्टींचा इशारा

Raju Shetty

 

कोल्हापूर (वृत्तसंस्था) भाजपाचे कार्यकर्ते पूरग्रस्तांसाठीची आर्थिक मदत बोगस नावे टाकून लाटतायत. हा सगळा पैसा आपल्या बापाचा आहे, त्यामुळे हे पैसे कार्यकर्त्यांना वाटू, असे चंद्रकांत पाटील यांना वाटत असेल. मात्र आपण गप्प बसणार नाही. गरज पडल्यास हाती दांडके घेऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.

पूरग्रस्तांसाठी सरकार आणि संपूर्ण राज्यभरातून आर्थिक मदतीचा ओघ येत आहे. मात्र, गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवकांना हाताशी धरून पूरग्रस्तांची आर्थिक मदत दुसऱ्यांच्याच खिशात घालण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. तर खऱ्या पूरग्रस्तांना डावलल्याने संताप अनावर झाल्यामुळे कोल्हापुरातील शिरोळच्या नवे दानवाड गावात तुंबळ हाणामारी झाली होती. पुराचे पाणी घरात शिरलेल्या कुटुंबीयांना रोख ५ हजार आणि बँक खात्यावर ५ हजार अशी १० हजारांची मदत राज्य सरकार देत आहे. मात्र, ग्रामसेवक आणि तलाठी यांनी बनवलेल्या पूरग्रस्तांच्या यादीत खऱ्या लाभार्थींना दूर ठेवून ज्यांच्या उंबरठ्यालाही पाणी शिवलेले नाही त्यांनीच मदत लाटल्याची तक्रार होते आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आपण गप्प बसणार नाही. गरज पडल्यास हाती दांडके घेऊ, असा इशारा दिला आहे.

Protected Content