मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी ठाणे येथे उपमुख्यमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना आपले राजकीय गुरु मानत असल्याचे सांगितले. ठाण्यातील आनंद आश्रम येथे त्यांनी स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.
पक्षात प्रवेश केल्यानंतर राजन साळवी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “9 तारखेला भाईंचा वाढदिवस असतो. त्या दिवशी मी भाईंना भेटलो आणि सांगितले की या शुभ दिवशी मला पक्षात प्रवेश करायचा आहे.” त्यांच्या या निर्णयानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. साळवी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “भाईंनी मला कुटुंबातील सदस्यासारखे प्रेम दिले. मी 2006 मध्ये आणि 2024 च्या निवडणुकीत पराभूत झालो. हा पराभव मला आणि माझ्या कुटुंबाच्या जिव्हारी लागला. मात्र, आता शिवसेनेत आल्यावर पुढील वाटचाल मधुर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.” उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत मंत्री उदय सामंत देखील उपस्थित होते. त्यांनी साळवी यांच्या प्रवेशाचे स्वागत करताना म्हटले, “साळवी साहेबांनी धनुष्यबाण घेऊनच शिवसेना वाढवली. मात्र, आता बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची खरी शिवसेना आपल्याकडेच आहे. संपूर्ण रत्नागिरी जिल्हा भगवामय करण्यासाठी आम्ही एकत्र काम करू.”
राजन साळवी यांनी कालच ठाकरे गटातील उपनेते पदाचा राजीनामा दिला होता. गेल्या काही दिवसांपासून ते ठाकरे गट सोडणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यांच्या राजीनाम्यानंतर यावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यांची मातोश्रीशी एकनिष्ठ नेत्याची ओळख होती. मात्र, अलीकडच्या काळात विनायक राऊत यांच्याशी झालेल्या वादामुळे आणि उद्धव ठाकरे यांनी राऊतांचीच बाजू घेतल्यामुळे ते नाराज झाले होते. विधानसभा निवडणुकीदरम्यान मदत न मिळाल्यामुळे त्यांचा पराभव झाला. यावर चर्चा करण्यासाठी ते मातोश्रीवर गेले असता, उद्धव ठाकरे यांनी “दरवाजे उघडे आहेत” असा सूचक इशारा दिला. यामुळेच त्यांनी शेवटी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला.
राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “जे पक्षात येतात त्यांचे आम्ही स्वागत करतो. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांची शिवसेना आम्ही पुढे नेणार आहोत. गेल्या अडीच वर्षांत आमच्या पक्षात अनेक आमदार, खासदार, नगरसेवक आले आहेत. हे काम करणारे सरकार आहे, फक्त घरी बसणारे नाही.” शिंदे यांनी पुढे सांगितले की, “आमच्या सरकारने लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका ज्येष्ठ यांसारख्या योजना राबवल्या. विकासाच्या अजेंड्यावर आम्ही काम करत आहोत. त्यामुळे शिवसेनेत नवीन नेते प्रवेश करत आहेत.”
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही राजन साळवी हे ठाकरे गटात राहिले होते. मात्र, त्यांच्या वादग्रस्त अनुभवांमुळे त्यांनी अखेर ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे आता शिंदे गटाला कोकणात आणखी बळकटी मिळणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.