धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांची लुटमार; पाच विक्रेते ताब्यात

भुसावळ प्रतिनिधी । एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेसमध्ये खाद्यपदार्थ विक्री करणार्‍यांनी दहा प्रवाशांना लुटल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये जळगाव स्थानक सोडल्यावर या विक्रेत्यांनी प्रवाशांकडे पैशांची मागणी करत त्यांना मारहाण सुरू केली. त्यांच्या जवळील रोख रक्कम आणि मोबाइल बळजबरीने हिसकावून घेतले. भुसावळ रेल्वेस्थानक येण्याच्या दहा मिनिटे आधी गाडी हळू होताच आउटरला उतरून त्यांनी पलायन केले. ही घटना १ जानेवारीला घडली.

यात एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेसमधील प्रवासी राजकुमार अरविंदकुमार यांचे ५ हजार रोख, शिवभोला यांचे ३०० रुपये रोख व साडेसात हजारांचा मोबाइल, हनुमान प्रसाद यांचे दीड हजार रुपये रोख व १० हजारांचा मोबाइल, चेतन शर्मा यांचे एक हजार रुपये रोख व ५ हजारांचा मोबाइल, मोहंमद इजहार यांचे ७०० रुपये व ७ हजारांचा मोबाइल, नसरुद्दीन यांचे अडीच हजार रुपये, हसीम यांचे मनगटी घड्याळ, राम मोहन यादव यांचे ३१०० रुपये रोख असा एकूण ४८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल १० चोरट्यांनी लांबवला.

या प्रकरणी प्रवाशांनी इटारसी येथे गुन्हा दाखल केल्यावर तो शनिवारी शून्य क्रमांकाने गुन्हा भुसावळ जीआरपी पोलिस ठाण्यात वर्ग झाला. येथे राजकुमार अरविंदकुमार (रा.करमिया, जि.बस्ती, उत्तर प्रदेश) यांच्या फिर्यादीवरून १० जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल झाला. जीआरपीच्या पथकाने या प्रकरणी तपासाची चक्रे फिरवून यातील पाच आरोपींना अटक केली असून इतरांचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेश सरडे, एपीआय परमेश्‍वर सोगे यांच्या मार्गदर्शनाखालील पथक करत आहे.

Protected Content