राजू सूर्यवंशींसह इतरांचे हद्दपारीचे आदेश रद्द

भुसावळ प्रतिनिधी | रिपाइं आठवले गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू भागवत सूर्यवंशी यांच्यासह आठ जणांचे हद्दपारीचे आदेश विभागीय आयुक्तांनी रद्द केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

शहरातील पंधरा बंगला भागातील रहिवासी व रिपाइंचे (आठवले गट) ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजू भागवत सूर्यवंशी व सोबतच्या ८ जणांना पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते. राजू सूर्यवंशी, दीपक सूर्यवंशी, रोहन राजू सूर्यवंशी, शेख इम्रान शेख गुलाम रसूल, किशोर भागवत सूर्यवंशी, कैलास भागवत सूर्यवंशी, आनंद भागवत सूर्यवंशी आणि हर्षल कैलास सोनार (सर्व रा.भुसावळ) यांना पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी १८ ऑगस्ट २०२१ रोजी जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते.

या आदेशाविरूद्ध सूर्यवंशी यांनी नाशिक येथे महसूल आयुक्तांकडे अपील दाखल केले. त्या अपिलावर दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बुधवारी पोलिस अधीक्षकांनी काढलेले हद्दपारीचे आदेश आदेश रद्द केले. या आदेशाची प्रत राजू सूर्यवंशी यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिली. यानंतर त्यांच्यासह आठही जण गुरुवारी भुसावळात घरी परतले. या माध्यमातून नगरपालिका निवडणुकीच्या आधी सूर्यवंशी यांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

Protected Content