रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची सूचना : रद्द झाल्यात ‘या’ प्रवासी गाड्या

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मध्ये रेल्वेच्या अमरावती स्थानकाजवळ रात्री उशीरा रेल्वे मालगाडीचे डब्बे घसरल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

सध्या दिवाळीमुळे रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी उसळली आहे. सर्व गाड्या प्रवाशांनी भरलेल्या असल्याचे दिसून येत आहे. येत्या अजून काही दिवसांपर्यंत ही गर्दी कायम राहणार असल्याचे संकेत आहेत. यातच काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास अमरावती स्थानकाजवळच्या मालखेड रेल्वे स्टेशनच्या जवळ मालगाडीचे डब्बे घसरल्याने या मार्गावरील रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे.

काल रात्रीपासूनच रेल्वे प्रशासनाने डब्यांना बाजूला करून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तथापि, यासाठी खूप वेळ लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, या अपघातामुळे दूर पल्ल्याच्या गाड्या या दुसर्‍या मार्गाने वळविण्यात आल्या असल्याने त्यांना खूप वेळ लागण्याची शक्यता आहे. तर आजच्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यात महाराष्ट्र एक्सप्रेस, वर्धा-भुसावळ पॅसेंजर तसेच अन्य गाड्यांचा समावेश आहे. ऐन सुटीच्या काळात रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे खूप हाल होणार आहेत.

Protected Content