


मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतातील परिवर्तनासाठी केवळ हिंदूंनाच नव्हे तर संपूर्ण समाजाला एकत्रित करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे, असे आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीच्या आयोजित सभेत ते बोलत होते.
सरसंघचालक मोहन भागवत हे ओडिशाच्या नऊ दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभुमीवर आयोजित सभेतील उपस्थितांना सरसंघचालक मोहन भागवत यांनी संबोधित केले. समाजाला संघटित करण्याची आवश्यकता आहे आणि संघ त्या दिशेने काम करत आहे. आमच्या मनात कुणाबद्दल द्वेष नाही. एका चांगल्या समाजाच्या निर्माणासाठी आपल्याला एकत्रित पुढे जायला हवे. देशात परिवर्तन आणण्यासाठी आणि विकासासाठी हे करायला हवे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. ‘भारतात एकतेचे दर्शन घडतं असून देशातील एकात्मतेमुळे मुस्लीम, पारसी आणि अन्य धर्माच्या लोकांना या देशात अधिक सुरक्षित वाटतं. पारसी भारतात सर्वात सुरक्षित आहेत. याशिवाय मुस्लीम नागरिकही खूश आहेत,’ असे मोहन भागवत म्हणाले. समाजात परिवर्तन घडवणारे आणि देशाचा कायापालट करण्यात महत्वाची भूमिका निभावणारी चांगली माणसे आपण घडवली पाहिजेत, असेही भागवत यांनी सांगितलं.


