अजित पवारांवर टीका करणे टाळा; भाजप नेत्याची आरएसएसला विनंती

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजपला आता संघाची गरज नाही भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मनधरणी करण्यासाठी प्रदेश भाजपच्या प्रमुख नेत्यांनी बुधवारी संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी मुंबईत बंद दरवाजाच्या आड चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत संघाच्या असहकार्यामुळे भाजपला अपयश आले. आता विधानसभेला तरी संपूर्ण सहकार्य करा, अशी विनंती भाजप नेत्यांनी केली. इतकेच नव्हे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीची भाजपला गरज आहे. त्यामुळे किमान यापुढे तरी त्यांच्यावर टीका करणे टाळा, अशी विनवणी भाजप नेत्यांनी संघाकडे केली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसल्यानंतर संघ परिवारानेही भाजपचे कान उपटले होते. ऑर्गनायझर या मुखपत्रातून व विवेक या मासिकातून संघ परिवाराशी संबंधित लेखकांनी अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपचे कसे नुकसान झाले, हे जाहीररीत्या सांगितले होते. भाजपप्रेमी मतदार व पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांचीही हीच भावना आहे. मात्र भाजपचे केंद्रीय नेते अजित पवारांशी युतीबाबत फेरविचार करण्यास तयार नाहीत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतीच पुण्यात सभा घेतली, त्यात त्यांनी अजित पवारांच्या गटासह महायुतीच्या नेत्यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. संघाने वारंवार सांगूनही भाजप अजितदादांची संगत सोडण्यास तयार नसल्याने संघ परिवारात अजूनही नाराजी आहे. या सर्व विषयांवर बुधवारच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार पंकजा मुंडे, आमदार नितेश राणे यांच्यासह भाजपचे काही ज्येष्ठ नेते संघ परिवाराच्या मुंबईतील ‘यशवंत भवन’ कार्यालयात गेले होते. संघाकडून सहसरकार्यवाह अतुल लिमये व अरुण कुमार, सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांच्यासह भारतीय मजदूर संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे प्रतिनिधीही उपस्थित होते. या नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली.

Protected Content