जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील रावेर, यावलसह जळगाव तालुक्यातील तापी नदीच्या काठावर केळी उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असले तरी यासाठी डांबरीकरण केलेल्या रस्त्यांनी नेहमी डागडुजी करावी लागते. ही समस्या लक्षात घेऊन केळी उत्पादन होत असलेल्या क्षेत्रात कॉंक्रिटचे रस्ते तयार करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. ते तालुक्यातील किनोद येथील शिवसंपर्क अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्ष स्थानी जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे होते.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत आज तालुक्यातील फुफणी ग्रामपंचायतीच्या समोर वृक्षारोपण करण्यात आले. याच्या अंतर्गत १२ फुट उंच असणार्या एकूण पाचशे वृक्षांची लागवडीचा शुभारंभ करण्यात आला . येथेच ग्रामस्थांतर्फे पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. तर यानंतर किनोद येथे शिवसंपर्क अभियानाच्या अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, वृक्ष फक्त लाऊन उपयोगाचे नसून त्यांना वाढवणेही तितकेच आवश्यक आहे. कृषी हा देशाचा आत्मा असून आमच्या विकासाचा केंद्रबिंदू देखील शेतकरीच आहे. सर्व शिवरस्त्यांचे डांबरीकरण करण्याला आपण प्राधान्य देणार आहोत. किनोद, फुफणीसह तापी नदीच्या काठावरील परिसरात यावल आणि रावेर प्रमाणेच केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. केळी वाहून नेली जात असतांना रस्ते खराब होण्याचे प्रमाण खूप आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून केळी उत्पादन होत असलेल्या भागात कॉंक्रिटचे रस्ते तयार करण्यात यावेत असा आपला संकल्प आहे. यासाठी मंत्रायलीन पातळीवरून रस्त्याच्या निकषांमध्ये बदल करावा लागणार असून आपण यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली. तर, किनोदसह परिसरासाठी ३३ केव्ही क्षमता असणारे स्वतंत्र वीज उपकेंद्र सुरू करणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले. यासोबत कार्यकर्त्यांनी जनतेच्या नेहमी संपर्कात राहून लोकांची कामे करावी असे आवाहन देखील ना. पाटील यांनी केले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे म्हणाले की, शिवसेनेकडे विकासाचे व्हिजन आहे. पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विकासाचे नवीन पर्व सुरू झाले आहे. यासाठी शिवसेनेकडे मोठा वर्ग आकर्षीत होत असून याच्या नोंदणीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन विष्णू भंगाळे यांनी केले. पंचायत समितीच्या सभापती ललीताताई पाटील यांनी शेरोशायरीने युक्त आपल्या भाषणातून उपस्थितांची मने जिंकली. त्या म्हणाल्या की, महिलांना सर्वतोपरी सन्मान देणार्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत काम करण्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यामुळे जास्तीत जास्त महिलांनी शिवसेनेत येण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. या कार्यक्रमाला तालुक्यातील पंधरा सरपंच पैकी १२ महिला सरपंचांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे आयोजन माजी सरपंच कमलाकर पाटील आणि त्यांच्या सौभाग्यवती तथा पंचायत समितीच्या माजी सभापती शीतलताई पाटील व पदाधिकारी यांनी केले होते.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर विष्णू भंगाळे, शिक्षकसेना जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सपकाळे, डॉ. कमलाकर पाटील, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण , संजय पाटील सर, जि. प . पवन सोनवणे, मुकेश सोनवणे, पंचायत समिती सभापती ललिताताई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, जनाआप्पा पाटील, नाना पाटील सर , सरपंच यमुनाबाई सपकाळे, उपतालुका प्रमुख प्रमोद सोनवणे, बाला शेठ लाठी, भरत बोरसे, मच्छीन्द्र नाना पाटील, मार्केटचे अनिल भोळे, मुरलीधर पाटील, रामचंद्र पाटील, गजानन सोनवणे, मुकुंदराव नन्नवरे समाधान चिंचोरे यांच्यासह परिसरातील 15 सरपंच पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभम पाटील, राधेशाम पाटील, समाधान सपकाळे, दादाराम सोनवणे , दीपक सोनवणे , कैलास सपकाळे , संदीप पाटील, निलेश वाघ, बाळू, अहिरे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
प्रास्ताविकात डॉ.कमलाकर पाटील यांनी सांगितले की, ट्री गार्ड सहा बारा फुटी उंचीचे भोकर पंचायत समिती गणातील ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी , जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, समाज मंदिर परिसर व इतर शासकीय कार्यालयांमध्ये 500 वृक्ष लागवड करून जोपासना करण्याचा संकल्प केलेला आहे. आजपासून त्याची सुरुवात करण्यात आली तसेच या पंचायत समिती गणात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या व विकास कामांचा आढावा दिला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. माजी उपसभापती शितलताई पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत गीताने स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील सर यांनी केले तर आभार कैलास सपकाळे यांनी मानले.