भुसावळ प्रतिनिधी । आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी वारकरी व भाविकांसाठी विशेष रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील भाविक आणि वारकरी आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणावर विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जातात. त्यांच्या सोयीसाठी ११ जुलै रोजी भुसावळवरून पंढरपूर साठी विशेष रेल्वेचे आयोजन माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली, खासदार रक्षाताई खडसे यांनी केले आहे. ही रेल्वे गाडी सकाळी ९.१५ मिनिटांनी भुसावळ येथून निघेल व पंढरपूर येथे रात्री १०.१० मिनिटांनी पोहोचेल. १२ जुलैच्याच रात्री ९.५० मिनिटांनी ही ट्रेन पंढरपूर येथून सुटेल व १३ जुलै रोजी दुपारी २.४० मिनिटांनी भुसावळ येथे पोहचेल. वारकरी व भाविकांनी या रेल्वेचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.