वाढीव वीज लोड मंजूर करा; वरणगावकरांचा महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन !

वरणगाव/जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरात नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वाकडे आले असले तरी, वाढीव वीज भार (लोड) मंजूर न झाल्यामुळे गेल्या १७ ते १८ दिवसांपासून भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आणि त्वरित तोडगा काढण्यासाठी आज वरणगावकरांनी जळगाव येथील महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल महाजन यांच्या कार्यालयासमोर तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केले. संतप्त महिलांनी हातात रिकामे मटके घेऊन प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदवला आणि तातडीने २४८ केव्हीचा अतिरिक्त वीज भार मंजूर करण्याची मागणी केली.

माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. आंदोलकांनी अधीक्षक अभियंता अनिल महाजन यांच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली आणि वाढीव वीज भार मंजूर न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला. महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, नवीन पाणी योजना कार्यान्वित होऊनही केवळ वीज भार मंजुरीच्या दिरंगाईमुळे त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

अधीक्षक अभियंता अनिल महाजन यांनी आंदोलकांशी संवाद साधला आणि त्यांची समस्या समजून घेतली. त्यांनी तातडीने महावितरणच्या उच्च अधिकाऱ्यांशी बोलून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. विशेष बाब म्हणून वाढीव वीज भार मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आंदोलक त्वरित कार्यवाहीच्या मागणीवर ठाम राहिले.

या आंदोलनात माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह मिलिंद भैसे, नाना चौधरी, किरण धुंदे, उपनगराध्यक्ष शेख आखलाख, शेख चंद्रकांत बढे, अरुण बावणे, माजी ग्रामपंचायत सदस्य रुक्मिणी काळे, सौ. सुभद्रा बावणे, सरलाताई गावंडे, मीनाक्षी जैन यांच्यासह अनेक प्रमुख नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Protected Content