चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसंवर्धन कार्यात आमच्यासोबत ‘मिशन-३००’ च्या पहिल्या मोहिमेपासून कार्यरत असणारे दुर्गसेवक रवींद्र सुर्यवंशी यांना दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळात पक्षाघाताचा झटका आल्याने त्यांना बोलण्यात अडचण येऊ लागली होती. १८ जून रोजी मल्हार गडावर गेले असताना मात्र ते अचानक उत्स्फुर्तपणे घोषणा देऊ लागले.
बोलण्यातील समस्येमुळे सार्वजनिक कार्यक्रमात येताना रवी भाऊंंना संकोच वाटायचा. त्यामुळे ते दुर्गसंवर्धन कार्यात सहभागी व्हायचेही टाळू लागले होते. त्यांचा मुलगा प्रितेश सुर्यवंशी एकदा बोलता-बोलता बोलून गेला की, माझे वडील पुन्हा गड-किल्ल्यावर गेल्याशिवाय मोकळे बोलू शकणार नाहीत. आणि १८ जून रोजी सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त घेतलेल्या दुर्गसंवर्धन मोहिमेत मी व माझे सहकारी हट्ट करून रवी भाऊंना मल्हार गडावर घेऊन गेलो. सांगायला आनंद वाटतो की, बोलायला संकोच करणारे आमचे रवीभाऊ, संताजी घोरपडे यांच्या प्रतिमेची पूजा करताना एका दमात घोषणा देऊ लागले, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘सरसेनापती संताजी घोरपडे यांचा विजय असो.’ त्यावेळी माझ्यासह अजय जोशी व योगेश शेळके यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.