धावत्या रेल्वेच्या धक्क्याने अनोळखी तरूणाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद ते भादली गावादरम्यानच्या रेल्वेलाईनवर एका अनोळखी ४० वर्षीय तरुणाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद ते भादली दरम्यानच्या अपलाइन वरील रेल्वे खंबा क्रमांक ४२७ च्या ११ आणि १३ च्या दरम्यान एका अनोळखी अंदाजे ४० वर्षीय तरुणाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार २२ मार्च रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. ही घटना घडल्यानंतर नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह रवाना करण्यात आला. दरम्यान यासंदर्भात नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटवावी असे आवाहन नशिराबाद पोलिसांनी केले असून ओळख पटल्यास नातेवाईकांनी नशिराबाद येथील पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव हे करीत आहे.

Protected Content